गरजू कुटुंबांतील मुलींच्या लग्नासाठी शासनाचा हात: ‘शुभमंगल योजने’तून मिळणार २५ हजार रुपयांचे अनुदान!
चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर, निराधार आणि विधवा मातांच्या मुलींचे लग्न आता आर्थिक अडचणीविना पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘शुभमंगल सामूहिक विवाह योजने’ अंतर्गत सामूहिक किंवा नोंदणीकृत (Registered) विवाह करणाऱ्या वधूच्या कुटुंबाला आता २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. चंद्रपूर जिल्हा महिला व बाल विकास विभागाने पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
योजनेचा लाभ या प्रवर्गातील वधूच्या पालकांना किंवा वधूला मिळेल, शेतकरी व शेतमजूर कुटुंबे.निराधार, परित्यक्त्या किंवा विधवा महिलांच्या मुली.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत आहे.वधू महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
थेट अनुदान: विवाहानंतर वधूच्या किंवा तिच्या आई-वडिलांच्या नावे २५,००० रुपये अनुदान दिले जाते. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रति जोडपे २५,००० रुपये प्रशासकीय सहाय्य मिळते. एका संस्थेला वर्षातून दोनदा सोहळा आयोजित करता येतो (किमान ५ ते कमाल १०० जोडप्यांपर्यंत).
वयाची अट: वधूचे वय १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: लाभार्थ्यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
👉१. विवाह नोंदणी प्रमाणपत्र (निबंधकांकडून मिळालेले).
👉 २. रहिवासी दाखला आणि उत्पन्न दाखला (तहसीलदार किंवा तलाठी यांचा).
👉 ३. वयाचा पुरावा: जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
👉 ४. बँक तपशील: बँक पासबुक, शाखा आणि आयएफसी (IFSC) कोड.
सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थांनी किंवा पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज आणि प्रस्ताव ‘जिला महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, आकाशवाणीच्या मागे, सिव्हिल लाईन, चंद्रपूर’ येथे सादर करावेत.







