लखमापूर, बाखर्डी अन् सोनुर्लीच्या विद्यार्थ्यांची गरुडझेप; जिल्हास्तरीय स्पर्धेत कोरपना अव्वल!
कोरपना:
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २०२६-२७’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कोरपना तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलेचे प्रदर्शन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत कोरपना तालुक्याने संपूर्ण जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावून विशेष गौरवास पात्र ठरला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, चावडी वाचन, चित्रकला आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लखमापूर, बाखर्डी आणि सोनुर्ली येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत नैतिक कुचणकार (लखमापूर) याने तृतीय, तर कु. गायत्री बांदुरकर (जि.प. हायस्कूल बाखर्डी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत कु. कनिष्का कांबळे (सोनुर्ली) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, बक्षीस वितरण प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांसोबत तालुक्यातील विद्यार्थिनींना मानाचे स्थान देण्यात आले होते. चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या समवेत कु. उन्नती वडस्कर, फालगुनी पोतराजे (उपरवाही) आणि गायत्री बांदुरकर (बाखर्डी) या विद्यार्थिनींनी मंचावर उपस्थित राहून तालुक्याचा मान वाढवला.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी १,००० रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, प्रकल्प अधिकारी मंजिरी टकले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पाताले आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल कोरपना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड, विस्तार अधिकारी लोकनाथ खंडारे, विलास देवाडकर, सुनील कोहपरे, तसेच केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, अण्णाराव आडे, तलांडे सर आणि रोहिदास राठोड यांनी सर्व विजेते विद्यार्थी, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.





