तक्रारीनंतर तहसील कार्यालयातील ‘मोबाईल वापरण्यास मनाई’चा बोर्ड अखेर काढला!
कोरपना, दि.५ एप्रिल: येथील तहसील कार्यालयात नागरिकांसाठी लावण्यात आलेला ‘कार्यालयात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे’ हा बोर्ड अखेर एका तक्रारीनंतर हटवण्यात आला आहे. या बोर्डामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती.
तहसील कार्यालयात विविध कामांसाठी दररोज अनेक नागरिक येत असतात. तहसीलदार यांच्या प्रवेशद्वाराजवळच लावलेल्या या बोर्डामुळे नागरिकांना महत्त्वाचे फोन घेणे किंवा माहिती पाहणे शक्य होत नव्हते. अनेकदा अर्ज भरताना किंवा इतर कामांसाठी मोबाईलमधील माहितीची गरज भासते. अशा परिस्थितीत मोबाईल वापरण्यास मनाई असल्याने नागरिकांची मोठी अडचण होत होती.
या संदर्भात एका जागरूक नागरिकाने तहसीलदारांकडे, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तसेच आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने नमूद केले होते की, ‘आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे माहिती आणि संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. कार्यालयात तातडीच्या कामांसाठी किंवा माहितीसाठी मोबाईल वापरण्याची गरज भासते. त्यामुळे संपूर्णपणे मोबाईल वापरण्यास मनाई करणे योग्य नाही.’
या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील ‘मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे’ हा बोर्ड हटवण्यात आला आहे. आता नागरिक कार्यालयात आवश्यकतेनुसार मोबाईलचा वापर करू शकणार आहेत.

तहसील कार्यालयाच्या या निर्णयामुळे तक्रारदारासह इतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सोयी-सुविधांचा विचार करून योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. यापुढे कार्यालयात मोबाईल वापराबाबत योग्य नियम व सूचना जारी केल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





