अनियमितता व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; आदेशानंतरही कारवाईच्या गतीवर प्रश्नचिन्ह
कातलाबोडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण
कोरपना – जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी अखेर कातलाबोडी ग्रामपंचायत कार्यालयातील महिला सचिवांशी संबंधित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या या प्रकरणाला आता अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे संकेत मिळाले असले तरी, ही चौकशी प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होईल आणि दोषींवर कधी कारवाई होईल, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सचिवांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणांमध्ये प्राथमिक स्तरावर काही गंभीर त्रुटी आढळल्याचे बोलले जात होते. या तक्रारींची दखल घेऊन सीईओ महोदयांनी पंचायत समिती कोरपना येथील विस्तार अधिकारी पवार यांच्याकडे चौकशी सोपवली असून सात दिवसाच्या आत त्वरित आणि सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकशीच्या गतीवर प्रश्नचिन्ह: CEO यांनी चौकशीचे आदेश देऊन भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर संदेश दिला असला तरी, प्रशासकीय स्तरावर अशा चौकश्या अनेकदा दीर्घकाळ चालतात, असा अनुभव आहे. यापूर्वीही अशा अनेक चौकश्यांचे अहवाल वर्षानुवर्षे धूळ खात पडल्याचे दाखले आहेत. त्यामुळे, महिला सचिवांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीविरोधातील या संवेदनशील प्रकरणाची चौकशी विहित वेळेत आणि निष्पक्षपणे पूर्ण होईल का? याबाबत शंका व्यक्त होत आहेत.
विशेषतः, काही राजकीय किंवा प्रशासकीय दबावामुळे ही चौकशी लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ‘आदेश झाले, म्हणजे तात्पुरती मलमपट्टी झाली’ पण ‘चौकशीचा अंतिम अहवाल कधी येणार आणि त्यानुसार कठोर कारवाई कधी होणार,’ हाच खरा प्रश्न आहे, अशी चर्चा कार्यालयाच्या वर्तुळात आणि नागरिकांमध्ये रंगली आहे.
भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणावर पडदा पडू न देता, पारदर्शक आणि समयबद्ध चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सीईओंच्या आदेशानंतर आता सर्वांचे लक्ष चौकशी समितीच्या कामाच्या गतीकडे आणि ते सादर करत असलेल्या अंतिम अहवालाकडे लागून राहिले आहे.






