१५ वर्षांनंतर होणारी जनगणना आता ‘डिजिटल’; हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!
जनगणना कामात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना.
लोकशाहीचा कणा: जनगणनेसोबतच मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा.
चंद्रपूर: “जनगणनेचे काम हा केवळ प्रशासकीय सोपस्कार नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. तब्बल १५ वर्षांच्या खंडानंतर ही प्रक्रिया होत असून, यंदा ती संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने हे काम अत्यंत अचूक, पारदर्शक आणि गांभीर्याने पूर्ण करावे,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने नागरिकांनी स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
जनगणनेच्या कामासाठी जास्तीत जास्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कामात टाळाटाळ करणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
केवळ ऑपरेटरवर अवलंबून न राहता अधिकाऱ्यांनी स्वतः जनगणनेचा कायदा आणि तरतुदींचा अभ्यास करावा.
जनगणनेसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेची माहिती घेतली. तसेच समृद्धी महामार्ग (ब्रम्हपुरी-भंडारा), नागपूर-चंद्रपूर महामार्ग आणि वर्धा-बल्लारशहा रेल्वे लाईनच्या भूसंपादन प्रक्रियेचाही वेग वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
निवडणूक पूर्व तयारी:
आगामी काळात निवडणूक आयोगातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘छायाचित्र मतदार यादी सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख यांनी सादरीकरण केले असून, सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या मोहिमेसाठी प्राथमिक तयारी पूर्ण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






