कोडशी बुद्रुक आणि कारवाई घाटावर जेसीबीचा थरार; रॉयल्टीविनाच वाळूची तस्करी, प्रशासन झोपले की झोपल्याचे सोंग?
कोरपना: तालुक्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, प्रत्यक्ष करारनामा (Agreement) होण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, करारनामा पूर्ण झाल्याशिवाय उत्खनन किंवा वाहतूक करू नये. मात्र, या आदेशाला धाब्यावर बसवून कोरपना तालुक्यातील कोडशी बुद्रुक आणि कारवाई या दोन घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू झाले आहे.
जेसीबी आणि पोकलेनचा उच्छाद
मिळालेल्या माहितीनुसार, या घाटांवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न फाडता रात्रीच्या आणि दिवसाच्या वेळीही वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून चक्क जेसीबी आणि पोकलेन सारख्या अवजड यंत्रांचा वापर करून नदीपात्राची चाळण केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘करारनामा आधी, मगच उत्खनन’ हा नियम केवळ कागदावरच राहिला असून, प्रत्यक्षात मात्र लिलाव धारकांनी मनमानी कारभार सुरू केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होत असतानाही स्थानिक महसूल प्रशासन आणि संबंधित विभाग गप्प का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. रॉयल्टीशिवाय होणाऱ्या या वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. परिसरात या बेधडक तस्करीची मोठी चर्चा सुरू असून, “यांना पाठीशी घालणारे नेमके आहेत तरी कोण?” असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
कारवाई होणार का?
एकीकडे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते, तर दुसरीकडे डोळ्यादेखत निसर्गाची लूट सुरू आहे. कोडशी बुद्रुक आणि कारवाई घाटावरील या अवैध प्रकारावर आता जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलणार की ही ‘केराची टोपली’ अशीच दुर्लक्षित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी या प्रकरणी तात्काळ पंचनामा करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.






