Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

अनधिकृत कापूस बियाणे व खत विक्रेत्यांवर कृषी विभागाचा दणका

अनधिकृत कापूस बियाणे व खत विक्रेत्यांवर कृषी विभागाचा दणका

5 फौजदारी गुन्हे दाखल

चंद्रपूर: खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभर विशेष गुणवत्ता नियंत्रण मोहीम हाती घेतली असून अनधिकृत कापूस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनधिकृत बियाणे विक्री प्रकरणी 5 तर खत विक्री प्रकरणी 1 फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकांनी केलेल्या कारवाईत बियाणे जप्तीची 5 प्रकरणे समोर आली असून, सुमारे 35.08 लाख रुपये मूल्याचा 17.75 क्विंटल बियाणे साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच खत जप्तीच्या एका प्रकरणात 0.26 लाख रुपये मूल्याचा 4.5 मेट्रिक टन खत साठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंद आदेश देण्यात आले असून, त्यांच्याकडील सुमारे 33.69 लाख रुपयांचा साठा सीलबंद करण्यात आला आहे. याशिवाय 20 खत विक्री केंद्रांनाही विक्री बंद आदेश देण्यात आले आहे. त्यांच्याकडील सुमारे 668.86 लाख रुपयांचा साठा नियंत्रणाखाली घेण्यात आला आहे.

खत विक्रीतील गंभीर अनियमितता लक्षात घेता 37 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, 3 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. मे-जून 2026 या कालावधीत अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या पाच गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आणि कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे तसेच तालुकास्तरीय कृषी अधिकारी यांच्या भरारी पथकांकडून जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.

शेतक-यांना आवाहन : शेतक-यांनी केवळ परवानाधारक कृषी केंद्रांतूनच बियाणे व खते खरेदी करावे. खरेदीवेळी पक्के बिल घेऊन ते जतन करून ठेवावे, तसेच कोणतीही संशयास्पद विक्री अथवा अनधिकृत व्यवहार आढळल्यास तात्काळ संबंधित कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Popular Articles