34 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही कोरपना तालुक्यात बसस्थानक नाही; विधानसभेत आमदारांची जोरदार मागणी
शासकीय ITI ची जागा शिल्लक असूनही सुविधा नाही, ‘शेवटच्या तालुक्या’ला न्याय कधी?
कोरपना/मुंबई: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कोरपना तालुक्याच्या बसस्थानकाचा मुद्दा जोरात गाजला. आमदार देवराव विठोबा भोंगळे यांनी सभागृहात लक्षवेधी मुद्दा मांडत सरकारला धारेवर धरले.
“माझ्या मतदारसंघामध्ये चार प्रशासकीय तालुके आहेत. यापैकी कोरपना तालुका, ज्याची निर्मिती 15 ऑगस्ट 1992 ला झाली, म्हणजे साधारणतः 34 वर्ष झाले. पण त्या तालुक्यामध्ये आजपर्यंत बसस्थानकाची व्यवस्था नाही,” असे आमदार भोंगळे सभागृहात म्हणाले.
आमदारांनी शासनाकडे तातडीने सुसज्ज बसस्थानक मंजूर करण्याची मागणी केली. “ज्या ठिकाणी शासकीय ITI आहे, त्याची जागा शिल्लक आहे. त्या जागेवर जर आपण बसस्थानक मंजूर करून बांधकाम केलं, तर गेल्या 34 वर्षांची जी प्रतीक्षा आहे ती संपेल,” अशी आग्रही विनंती त्यांनी केली.
कोरपना हा जिल्ह्याचा शेवटचा तालुका असून, मूलभूत बस सुविधेपासून वंचित असल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली. “कोरपणा जो शेवटचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये लोकांना बसची सुविधा मिळेल ही माझी शासनाला विनंती आहे,” असे ते म्हणाले.
1992 साली तालुक्याची निर्मिती झाली, पण 3 दशकांहून अधिक काळ उलटूनही येथील नागरिकांना हक्काच्या बसस्थानकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ITI ची जागा उपलब्ध असूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प रखडल्याचा आरोप होत आहे.
आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे कोरपना तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.






