कोरपना तालुक्यात जनावरे चोरांचा सुळसुळाट; ‘हेटी’नंतर आता ‘नारंडा’ लक्ष, शेतकरी हवालदिल!
कोरपना: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जनावरे चोरणाऱ्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी हेटी येथून एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, आता नारंडा येथून पुन्हा तीन नग (जनावरे) गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
गावात दहशतीचे वातावरण: गावातील नागरिकांच्या गाड्या चोरीला जाणे, घरफोडीच्या घटना होणे. शेतकऱ्यांच्या बैल जोडीचीही चोरी होणे, या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर जरब निर्माण करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
चोरांच्या या वाढत्या धाडसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी गोठ्यात गुरे बांधणे आता धोक्याचे झाले आहे. “आमचे धन डोळ्यादेखत चोरीला जात आहे, पोलिसांनी आता तरी जागे व्हावे,” अशी आर्त हाक शेतकरी वर्गाकडून दिली जात आहे.






