गडचांदूरमध्ये शिवभोजन केंद्राचा अजब कारभार; बोगसगिरी उघड! सीसीटीव्ही गायब आणि फोटोचा ‘डबल’ खेळ; कारवाईची प्रतीक्षा!
गडचांदूर: राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आणि गरिबांसाठी आधार ठरलेली ‘शिवभोजन योजना’ गडचांदूर येथे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील एका केंद्रावर नियमांना केराची टोपली दाखवत चक्क सीसीटीव्ही कॅमेरे गायब करण्यात आले असून, देयके (Bills) काढण्यासाठी एकाच व्यक्तीचे दोन-दोन वेळा फोटो काढून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शिवभोजन योजनेच्या नियमानुसार, केंद्र परिसरात सीसीटीव्ही असणे आणि प्रत्येक लाभार्थ्याचा पारदर्शक पद्धतीने फोटो घेणे अनिवार्य आहे. मात्र, गडचांदूर येथील या केंद्रावर जाणीवपूर्वक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केंद्रावर होणारी गर्दी आणि लाभार्थ्यांची संख्या फुगवून दाखवण्यासाठी ‘डबल फोटो’ काढले जात आहेत. म्हणजेच, एकाच व्यक्तीला दोनदा रांगेत उभे करून किंवा वेगवेगळ्या कोनातून फोटो काढून शासन दरबारी दोन थाळ्यांचा हिशोब सादर केला जात आहे.
कमी लोकांना जेवण देऊन जास्त लोकांची देयके उचलण्याचा हा प्रकार म्हणजे सरळ-सरळ शासकीय निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. सीसीटीव्ही नसल्यामुळे नेमके किती लोक जेवले आणि केंद्रावर अन्नाचा दर्जा काय आहे, याचा कोणताही पुरावा शिल्लक राहत नाही. या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या सर्व प्रकाराकडे संबंधित पुरवठा विभागाचे आणि तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सीसीटीव्ही गायब असताना आणि फोटोंमध्ये तफावत असतानाही या केंद्राची देयके मंजूर कशी होतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करण्याची मागणी नागरिक करत आहेत.






