शहरात गुन्हेगारीचा टक्का वाढला; सीसीटीव्हीच्या मागणीकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
मुख्याधिकाऱ्यांचे ‘सभेत पाहू’चे आश्वासन; नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट
कोरपना: शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत विचारणा केली असता, “हा विषय आगामी सभेत मांडू,” असे त्रोटक उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरात चोरी, दुचाकी पळवणे आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुख्य बाजारपेठ, गर्दीचे चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. पोलिसांनाही तपासासाठी खासगी दुकानांमधील सीसीटीव्हीवर अवलंबून राहावे लागत आहे.
प्रशासकीय दिरंगाई?: अनेक वेळा मागणी करूनही नगरपंचायतीने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. शहराचा ‘डीपीडीसी’ (DPDC) निधी किंवा नगरपंचायतीच्या स्वनिधीतून हे काम होणे अपेक्षित आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हे काम रखडले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे: आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय पटलावर ठेवून त्याबाबत कायदेशीर मंजुरी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.” — मुख्याधिकारी, नगरपंचायत
शहरातील व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांनी नगरपंचायतीला इशारा दिला आहे की, जर येत्या काही दिवसांत सीसीटीव्हीबाबत ठोस कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. केवळ ‘सभेचे’ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.






