मोठी बातमी: ‘कोरपना एक्सप्रेस’च्या दणक्यानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये; शिक्षणाधिकाऱ्यांचे कठोर कारवाईचे संकेत!
संपादक यांची शिक्षणाधिकाऱ्यांशी भेट; बोगस मतदार नोंदणी प्रकरणातील दोषी ‘मन्ने’ गुरुजींचे मुख्याध्यापक पद धोक्यात?
कोरपना/चंद्रपूर: लोकशाहीच्या पवित्र मतदार यादीत अल्पवयीन मुलांची नावे घुसवून घोळ करणाऱ्या कोरपना येथील ‘त्या’ वादग्रस्त शिक्षकाचा पाठराखण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘साप्ताहिक कोरपना एक्सप्रेस’ ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, आता थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दोषी शिक्षकावर कठोर प्रशासकीय आणि शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश लवकरच निर्गमित करण्याची कबुली शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
संपादकांचा थेट धडाका: कोरपना एक्सप्रेसचे संपादक यांनी बुधवारी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा कच्चाचिठ्ठा त्यांच्यासमोर मांडला. १६ वर्षांच्या मुलांचे वय १८ दाखवून मतदार यादीत फेरफार करणे आणि निवडणूक आयोगाचा गोपनीय आयडी-पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला देणे, हे किती गंभीर आहे याची पुराव्यासहित माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली.
काय म्हणाले शिक्षणाधिकारी?
या भेटीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि गोपनीयता भंग करणे हा गंभीर अपराध आहे. “तहसीलदार आणि बी.डी.ओ. यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित शिक्षण संस्थेला आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे पत्र काढण्यात येईल. अशा प्रवृत्तीला खतपाणी घातले जाणार नाही,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मुख्याध्यापक पदाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह?
एकडे चौकशी सुरू असतानाच श्री. मन्ने यांना मिळालेली मुख्याध्यापक पदाची पदोन्नती आता रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चुकीची माहिती देऊन किंवा चौकशीची बाब लपवून जर ही मान्यता मिळवली असेल, तर ती तातडीने रद्द करण्याबाबतही प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर आता चेंडू संबंधित शिक्षण संस्थेच्या आणि बी.डी.ओ.च्या दरबारात आहे. जर प्रशासनाने ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर ‘कोरपना एक्सप्रेस’ या प्रकरणाचा पाठपुरावा थेट मंत्रालयापर्यंत आणि मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत करेल, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
”लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार जर तात्काळ पत्र निर्गमित झाले नाही, तर आम्ही हा लढा अधिक तीव्र करू.”
— संपादक, साप्ताहिक कोरपना एक्सप्रेस






